Friday, 29 March 2013

हिंदी नाटकात गुजरातचे मराठी मुखवटे

प्रार्थना बेहेरे
पीयूष रानडे

















लवकरच येणा-या एका नव्या हिंदी नाटकात प्रार्थना बेहेरे आणि पियूष रानडे ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. या निमित्ताने ही बडोद्याची मराठी जोडी हिंदी नाटकात चमकेल. विशेष म्हणजे याचं लेखन , दिग्दर्शन प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने केलं आहे.

चांगल्या बॅनरचा सिनेमा मिळाला की त्यातल्या नायक-नायिकेला इतर सिनेमांसाठी विचारणा होऊ लागते. अशांना मग एकामागून एक सिनेमे मिळत जातात. पण , ' जय महाराष्ट्र धाबा , बठिंडा ' मधली जोडी अभिजीत खांडकेकर-प्रार्थना बेहेरे ही जोडी त्याला अपवाद ठरली आहे. अभिजीतने मराठी नाटक स्वीकारलेलं आहेच. पण , त्यापाठोपाठ प्रार्थना बेहेरेही आता आगामी हिंदी नाटकामधून चमकणार आहे. तिचं हे पहिलंच नाटक असून , मूळ बडोद्याच्या असलेल्या प्रार्थनाचा हिंदीतला नायक असेल तिच्याच शहरातून आलेला मराठी कलाकार पियूष रानडे.

हे नाटक हिंदी असलं तरी याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने. यामध्ये अंजन श्रीवास्तव , रीमा हे कलाकारही असणार आहेत. आपल्या पहिल्या नाटकाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली , ' यापूर्वी मी टीव्ही , सिनेमा केला होता. पण , नाटकात काम केल्यामुळे एका कलाकाराची ग्रोथ होते असं मला अनेकांनी सांगितलं. म्हणून नाटक करायचं होतंच. पियूष हा माझा चांगला मित्र आहे. त्याने माझं नाव निर्मात्याला सुचवलं. मराठीपेक्षा माझं हिंदी चांगलं आहे. नाटकात हजरजबाबीपणा लागतोच. शिवाय भाषेवर प्रभुत्वही हवं. म्हणून मी आधी हिंदी नाटक निवडलं. पुढे मराठी नाटकातही मला काम करायचंय. '

या नाटकाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण हा फॅमिली ड्रामा आहे. कुटुंबातल्या विसंवादावर यामध्ये तिरकस भाष्य असेल. ' या कुटुंबात ही मुलगी बाहेरुन येते आणि तिचा या फॅमिलीला त्रास होऊ लागतो. पण , सुरुवातीला नकोशी वाटणारी ही मुलगी नंतर संपूर्ण कुटुंब बदलते असं याचं सार आहे. एकदम मॉड , बबली अशी ही भूमिका आहे ,' असंही प्रार्थनाने सांगितलं. विशेष म्हणजे , यात तिचा नायक असणार आहे पियूष रानडे. त्याचं हे तिसरं व्यावसायिक नाटक. ' बडोद्यात कॉलेजमध्ये असताना मी अनेक नाटकं केली. दरम्यान मी व्यावसायिक रंगमंचावर पाय ठेवला तो गुजराती नाटकातून. त्यानंतर दुसरं हिंदी नाटक केलं आणि आता हे तिसरं. प्रार्थना बडोद्याचीच असल्याने आमची ओळख होती. शिवाय या नाटकाची गरज लक्षात घेता , तिचं नाव मी सुचवलं. नाटकातल्या फॅमिलीमधला मी मुलगा आहे. सोबत अंजन श्रीवास्तव आणि रीमा असल्याने खूप शिकायला मिळतंय. ' बडोद्यात असताना पियूषने अनेक गुजराती , हिंदी , मराठी , उर्दू प्रायोगिक नाटकांमधून काम केलंय.

Wednesday, 27 March 2013

अवघे जग झाले रंगभूमी...

मूळचे नाशिकचे असलेले पण मुंबई व त्यानंतर सातासमुद्रापार अमेरिकेमध्ये रंगभूमी गाजविणारे दीपक करंजीकर व विद्या करंजीकर हे जोडपे आजवर अभिनयाचा प्रवास नाटक, सिनेमा, कविता यांसारख्या माध्यमातून करत आहेत. जागतिक रंगभूमीदिनानिमित्त त्यांच्या या समृद्ध प्रवासाबद्धल :
लहानपणापासून विद्या करंजीकर यांना अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात एक एकपात्री प्रयोग केल्यानंतर त्यांना सुवर्णपदक मिळालं आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी विचारणा झाली. नाना पाटेकरांबरोबर त्यांनी पहिलं ‘आई शप्पथ’ हे नाटक केलं. त्यानंतर दिलीप
प्रभावळकरांबरोबर ‘वट वट सावित्री’, सुधीर भटांच्या ‘ब्रम्हचारी’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. ब्रम्हचारी या नाटकाचे त्यांनी पहिले 187 प्रयोग केलेत. विद्या मुळच्या पार्ल्याच्या. लग्न होऊन त्या नाशिकला स्थायिक झाल्या आणि नाशिकच्या रंगभूमीला दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दोन रंगकर्मी मिळालेत. दीपक करंजीकरदेखील महाविद्यालयीन जीवनापासून हौशी रंगभूमीवर काम करीत होते. ‘त्या एका वळणावर’ हे दोघांची भूमिका असलेले व्यावसायिक नाटक अत्यंत गाजले. कॅलिफॉर्निया आर्ट असोसिएशन या संस्थेद्वारा त्यांनी महेश एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ नाटक तसेच अनेक एकांकिका केल्या. मराठीबरोबरच इंग्रजी व हिंदी नाटकांमध्ये काम केले. असोसिएशानद्वारा त्यांनी कवितेचा आॅपेरा म्हणजे सत्तर वर्षांमधले कवी व त्यांच्या शंभर कवितांवर आधारित नाट्यमय कार्यक्रम त्यांनी केला. याचबरोबर त्यांनी आठ इंग्रजी नाटके, सहा हिंदी नाटके व आठ-दहा मराठी नाटके या असोसिएशनमार्फत सादर केली. मराठीमध्ये विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सावर रे’ आदी नाटकांना तिथल्या मराठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांनी एव्हरीवन लव्हज द गुड त्सुनामी, व्हेअर देअर इज अ विल हे महेश दत्तानी या इंग्रजी लेखकाचे नाटक अशी अनेक नाटके सादर केली.
कॅलिफॉर्नियामध्ये भारतातून स्थायिक झालेली मराठीपेक्षा हिंदी लोकसंख्या जास्त आहे. नाटकची कवितेशी असलेली जवळीक लक्षात घेऊन त्यांनी मराठीतल्या 22 कवींच्या ग्रेस, कोलटकर, बहिणाबाई, विंदा करंदीकर यांच्या हिंदीत भाषांतरित कविता सादर केल्या याशिवाय नाटक करण्यास पूरक अशा देहबोलीच्या कार्यशाळा त्यांनी तिथे घेतल्या. तिथल्या इंग्रजाळलेल्या व भारतीय संस्कृती व समस्यांशी अनभिज्ञ असलेल्या नव्या भारतीय पिढीला त्यामुळे मराठी, हिंदी नाटकांची समृद्ध परंपरा कळण्यास मदत झाली.

Monday, 25 March 2013

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी; आपटे आपटले


नटराज पॅनलचा 13 मतांनी पराभव,  उपाध्यक्षपदी भुसारी 

बनावट मतपत्रिकांवरून वादाच्या वादळात भरकटलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जहाजाचे सुकाणू सावरण्यासाठी अखेर कॅप्टन मिळाला. परिषदेच्या अध्यक्षपदी रविवारी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची बहुमताने निवड झाली. जोशी यांना 28, तर त्यांचे विरोधक, ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांना 15 मते पडली.  
माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात पार पडलेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जोशी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रमोद भुसारी, प्रमुख कार्यवाह म्हणून दीपक करंजीकर, कोशाध्यक्षपदी लता नार्वेकर, सहकार्यवाहपदी भाऊसाहेब भोईर व सुनील वणजू यांची निवड करण्यात आली. प्रसाद कांबळी, प्रफुल्ल महाजन, सतीश लोटके, श्रीपाद जोशी, सुनील ढगे, दिलीप बेवरणकर, किशोर आयनवार व वि. ना. लोकूर यांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड झाली.   
जोशी यांचे उत्स्फूर्त पॅनल व आपटे यांचे नटराज पॅनल या दोघांनाही मुंबईत समान म्हणजे प्रत्येकी 8 मते पडली होती, परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोशी यांच्या पॅनेलला अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पॅनलचा परिषदेवर वरचष्मा राहणार, हे निश्चित होते; परंतु मतदारांच्या संख्येपेक्षा मतपत्रिकांचीच संख्याच जास्त भरल्याने या प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी दोन्हीही गटांनी केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरून मोठा गदारोळ उठला होता. या पेचावर मार्ग काढण्यासाठी मुंबई विभागाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत हे प्रकरण सहधर्मादाय आयुक्तांकडे नेण्यात आले. या बोगस मतपत्रिका प्रकरणाची पोलिस चौकशी अद्याप सुरू आहे.  


सर्वच भागांना प्रतिनिधित्व 
४यापूर्वी नाट्य परिषदेच्या कारभारावर केवळ मुंबईचीच मक्तेदारी होती, परंतु नव्या कार्यकारिणीत राज्यातील सर्वच भागांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याचा नाट्य परिषदेच्या कारभारावर चांगला परिणाम होणार असून राज्याच्या तळागाळात नाट्य चळवळ पोहोचेल. मराठी नाट्य चळवळीला भरभराटीचे दिवस येतील.
प्रफुल्ल महाजन,  कार्यकारिणी सदस्य

Saturday, 23 March 2013

राजकीय ‘नाट्य’

पीयूष नाशिककर
नाट्य परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हळूहळू त्यामागील राजकारणाने तोंड वर काढले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकच्या विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे पाहिले तर ठाकूर यांचा नाटकाशी काय संबंध? हा जरा संशोधनाचा भाग ठरेल. पण ठाकूर हे राष्टÑवादीच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची राष्टÑवादीतील मंडळींशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहेच. तसेच नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे मावळते अध्यक्ष आमदार हेमंत टकले हे नाशिकचेच. ते तर खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘थिंक टॅँक’ समजले जातात. तर नावाप्रमाणेच ठाकूर हेदेखील त्यांच्या विश्वासातील आहेत. दुसरीकडे  टकले यांचा पाठिंबा विनय आपटेंच्या नटराज
पॅनलला आहे.  नुकतेच झालेले नाट्यसंमेलन हे ‘साहेबांच्या’ बारामतीत झाले. या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर कुठेतरी नाट्य परिषद निवडणुकीच्या या राजकीय प्रयोगाची तालीम यापूर्वीच झाल्याचे स्पष्ट होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर हे नाशिक येथील विश्वास बॅँकेचे संस्थापक, अध्यक्ष, ‘अर्थ’ क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. असे असताना सहकार क्षेत्रात ‘ठाकूर’ची भूमिका वठवणाºया या पात्राला नाट्य क्षेत्रात ही भूमिका कशी मिळाली हा प्रश्नच आहे. त्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक कोणत्या निकषांवर केली हे आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे.
मोहन जोशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी नाशिकचा असण्यावर आक्षेपही घेतला होता. यावर ठाकूर यांनी आपल्याला या कामाबद्दल विचारण्यात आले आणि मी होकार दिला. जोशींना आक्षेप घ्यायचा होता तर नियामक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण पुन्हा मुद्दा तोच राहतो की, ठाकूरच का? त्यातही मतपत्रिका नाशिकला छापल्या गेल्या आणि मुंबईत तब्बल 1999 बोगस मतदान आढळल्याने ठाकूर यांच्याकडे अनेकांनी बोट दाखवले. अशा अनक मुद्द्यांमध्येच जोशी आणि आपटेंची पूर्वीची जखम ताजी होत होती. याची तयारी अगदी निवडणुकीच्या आधीपासूनच करण्यात येत होती. जरा मागे वळून पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आई रेणुका मातेच्या पवित्र ठिकाणीच रंगदेवतेची पूजा करणाºया मोहन जोशींनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उपाध्यक्ष हेमंत टकलेंनी अध्यक्षपदाची स्वीकारलेली सूत्रे आणि जोशींकडे मागितलेला हिशेब यामुळे जोशी दुखावले गेले होतेच.  दुसरीकडे जोशी अध्यक्ष असताना त्यांनी 2009 च्या बैठकांना आपटे आणि प्रशांत दामले सलग तीन वेळा गैरहजर असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याची नोटीस बजावली होती. त्यामुळेही आपटे दुखावले गेले होते. दोघांच्याही या जखमांवरची खपली कुठेतरी या निवडणुकीच्या निमित्ताने निघू पाहते आहे. त्यामुळेच हा कलगीतुरा रंगतो आहे. कदाचित याची कुणकुण ‘उत्स्फूर्त’ पॅनलच्या मोहन जोशी यांना यापूर्वीच लागली असेल. म्हणूनच त्यांनी विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचे आरोपही केले होते.
नाट्य परिषदेचे हे राजकारण केवळ मुंबईतच रंगले असे नाही तर रत्नागिरी, नाशिकमध्येही सत्तेसाठी चढाओढ झाली. रत्नागिरीत आमदार उदय सामंत हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात लेखक प्र. ल. मयेकर यांनी अर्ज दाखल केला होता. सामंतांनी मयेकरांना सरळ माघार घ्यायला सांगितली. मयेकरांनीही दोन खडे बोल सुनावले. तिकडे असा फड रंगत असताना नाशिकमध्ये तर सुरुवातीला प्रत्यक्ष राजकारणच निवडणुकीत येत होते. जुने रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते आमदार बबनराव घोलप यांनीही अर्ज दाखल केला होता. निवडणुका झाल्यावर नाशिकच्याच एका ज्येष्ठ कलाकाराने येथेही बोगस मतदान झाल्याची तक्रार केल्याने हे राजकारण अधिकच तापले.  कलाकारांकडे आज तरी रसिक मायबाप आदराने पाहतात. पण त्यांच्यातील राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने असे चव्हाट्यावर आल्यावर यांना रसिकाश्रय मिळेल का, याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या मुखवट्यावरील रंग उतरायला वेळ लागणार नाही.