हृषिकेशला २००३ ते २००५ या काळात केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीअंतर्गत तो 'मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनयाचा प्रवास' या विषयावर संशोधन करत होता. या संशोधनादरम्यान अनेक नाटकांचे वाचन करण्याचा योग आला. रंगभूमीच्या इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर लिहिल्या गेलेल्या नाटकांत अनेक साम्यस्थळे आढळली. त्यातून या नाटकाची संकल्पना सुचल्याचे हृषिकेशने 'वृत्तांत'शी बोलताना सांगितले. आता हे नाटक दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य हे चार निर्माते एकत्र येत रंगभूमीवर आणत आहेत.
या काळात प्रत्येक दशकात मैलाचा दगड ठरलेले एक नाटक घेऊन आपण त्यातील प्रसंग आजच्या काळाशी बांधले आहेत. यात 'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते 'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांचा समावेश केला आहे. त्यातील प्रसंगांचा विचार करून त्याभोवती आपण नाटय़ रचले आहे, असे हृषिकेशने सांगितले. सध्या समाजात जे प्रकार घडत आहेत, त्याबाबत फक्त चर्चा केल्या जातात. पण त्याच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. या नाटकाच्या माध्यमातून आपण नेमका तोच प्रयत्न केल्याचे त्याने स्पष्ट केले.
या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी असे दहा कलाकार काम करत आहेत.
हे दहा कलाकार नाटकांत एकूण २३ भूमिका पार पाडतील. त्याशिवाय प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना केली असून राहुल रानडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. संगीत नाटकांपासून ते समांतर नाटकांपर्यंतचा नाटय़सृष्टीचा आणि काळाचाही प्रवास १२ मेपासून रंगभूमीवर येत आहे.
No comments:
Post a Comment