Thursday, 2 May 2013

‘झालाच पाहिजे!’चा दिमाखदार शुभारंभ

बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला.
मुंबई- बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला. या प्रयोगाला ‘स्वाभिमान’ संघटनेचे प्रमुख आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’चे मुख्य प्रवर्तक नितेश राणे, ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर, चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेरकर, आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पहिला प्रयोग पाहण्यासाठी सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. नाटकाला येणा-या प्रेक्षकांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. नाटकातील एक कलाकार सुबोध भावे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर नाटकाचा नेत्रदीपक प्रयोग सादर झाला. बेळगाववासीयांचे दु:ख मांडणा-या या नाटकातील प्रसंगांनी प्रेक्षक हेलावून गेले. सुबोध भावे, सविता मालपेकर, हेमंत ढोमे, मानसी सिंग, रमेश वाणी, अनिल रसाळ, संदेश उपशाम या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
या प्रसंगी नितेश राणे म्हणाले, बेळगाववासीय जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सार्थकी लागणार नाहीत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला असता आणि मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला नसता, तर मुंबईकरांचे काय झाले असते, असा सवाल त्यांनी प्रेक्षकांना केला. १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र येऊन हुतात्म्यांनी सुरू केलेली संयुक्त महाराष्ट्राची लढाई पुढे सुरू ठेवायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर यांनी नाटकाचे कौतुक करत सांगितले की, सध्या प्रत्येक वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर बिल्डरांच्या जाहिराती पाहायला मिळतात. परंतु, आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ‘झालाच पाहिजे!’ची जाहिरात पाहून बरे वाटले. या नाटकामुळे विस्मरणात गेलेल्या प्रश्नावर पुन्हा प्रकाश टाकला जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मराठी रंगभूमीवर 'नांदी' अवतरणार

मुंबई : तब्बल दीडशे वर्षांहून जास्त परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक प्रयोग होत आहेत. रंगभूमीवर ट्रेनचा अख्खा डबा उभा करण्यापासून ते जुनी नाटके पुनरुज्जीवित करण्यापर्यंत अनेक गोष्टी घडत आहेत. मात्र या दीडशे वर्षांत प्रत्येक दशकात मैलाचा दगड ठरलेल्या एकेका नाटकाचा आधार घेऊन त्या अनुषंगाने आजच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणारे एखादे नाटक आले तर? विचारानेच गंमत वाटते ना! पण मराठी नाटय़सृष्टीतील चार निर्माते एकत्रितपणे असे नाटक घेऊन येत आहेत. हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित 'नांदी' या नाटकाच्या माध्यमातून काळाच्या पुढे आणि काळाच्या मागे जाऊन नाटकांमधील या स्थित्यंतराचा वेध घेतला आहे.
हृषिकेशला २००३ ते २००५ या काळात केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीअंतर्गत तो 'मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनयाचा प्रवास' या विषयावर संशोधन करत होता. या संशोधनादरम्यान अनेक नाटकांचे वाचन करण्याचा योग आला. रंगभूमीच्या इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर लिहिल्या गेलेल्या नाटकांत अनेक साम्यस्थळे आढळली. त्यातून या नाटकाची संकल्पना सुचल्याचे हृषिकेशने 'वृत्तांत'शी बोलताना सांगितले. आता हे नाटक दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य हे चार निर्माते एकत्र येत रंगभूमीवर आणत आहेत.
या काळात प्रत्येक दशकात मैलाचा दगड ठरलेले एक नाटक घेऊन आपण त्यातील प्रसंग आजच्या काळाशी बांधले आहेत. यात 'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते 'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांचा समावेश केला आहे. त्यातील प्रसंगांचा विचार करून त्याभोवती आपण नाटय़ रचले आहे, असे हृषिकेशने सांगितले. सध्या समाजात जे प्रकार घडत आहेत, त्याबाबत फक्त चर्चा केल्या जातात. पण त्याच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. या नाटकाच्या माध्यमातून आपण नेमका तोच प्रयत्न केल्याचे त्याने स्पष्ट केले.
या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी असे दहा कलाकार काम करत आहेत.
हे दहा कलाकार नाटकांत एकूण २३ भूमिका पार पाडतील. त्याशिवाय प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना केली असून राहुल रानडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. संगीत नाटकांपासून ते समांतर नाटकांपर्यंतचा नाटय़सृष्टीचा आणि काळाचाही प्रवास १२ मेपासून रंगभूमीवर येत आहे.

Monday, 22 April 2013

स्त्री नाट्य मंडळींची शतकपूर्ती


- निवृत्ती शिरोडकर

महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना २७ एप्रिल १९१३ रोजी घडली आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. या अभूतपूर्व घटनेला १00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने..

देशाच्या नकाशावर ठिपक्याएवढय़ा असणार्‍या गोव्याने कलेच्या क्षेत्रात मात्र आभाळाएवढी कामगिरी केली आहे. नररत्नांची खाण असणार्‍या गोव्याने अनेक कलाकार महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्र गोव्याच्या गळ्य़ाने (लता मंगेशकर) गातो असे म्हटले जाते, ते उगीच नाही. भारतीय चित्रपटाची गेल्यावर्षीच शतकपूर्ती झाली. भारतीय नाटकानेही शतक पार केले आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना घडली. आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. २७ एप्रिल १९१३ रोजीच्या या अभूतपूर्व घटनेला यंदा १00 वर्षे पूर्ण होत आहेत.
१00 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी पार्से येथे श्री भगवती मंदिरासमोरील भव्यदिव्य वटवृक्षाखाली रंगमंचावर नाटक सादर केले होते, त्याच रंगमंचावर पुन्हा १00 वर्षांनी २७ एप्रिल रोजी महिलांचे नाटक सादर होणार आहे.
वैभवशाली पेडणे महाल भौगोलिकदृष्ट्या विकासापासून वंचित असला तरी इतर क्षेत्रांत मात्र आघाडीवर. याच तालुक्यातील लहानसा गाव पार्से. दोन्ही बाजूला डोंगर व मधोमध वसलेला. पार्सेचे भगवती मंदिर तसेच ब्रह्म विष्णू महेश्‍वर मंदिरावर नजर टाकल्यास या गावचे वैभव दिसून येईल. याच पार्से गावात १९१३ साली पहिली स्त्री-संगीत नाटक मंडळीची स्थापना करून वेगवेगळ्या भागात नाटकाचे प्रयोग केवळ स्त्री कलाकारच करायचे. स्त्री कलाकारच पुरुषाची भूमिका वठवायचे. या स्त्री संगीत नाट्य मंडळीने गोवा व महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळविले होते.
डोंगराच्या कुशीतील या पार्से गावाने तशीच डोंगराएवढी माणसेही जन्माला घातली. डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईचे शिल्पकार याच गावातले, सुप्रसिद्ध व्हायोलियन वादक पं. श्रीधर पार्सेकरदेखील इथलेच. पार्सेकर यांच्या मातोश्री हिराबाई पार्सेकर ह्या प्रमुख स्त्री कलाकार आणि उत्कृष्ट गवई होत्या. त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत.
ताराबाई पार्सेकर यांनी आपल्या जुन्या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. पार्से येथील बलवंत पार्सेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्री मंडळ स्थापन झाले. पूर्वी पार्से गावातील अनेक स्त्री कलाकार विविध भागातून पुरुष मंडळींच्या नाटकात स्त्री कलाकारांची भूमिका वठवायच्या. त्या सर्व कलाकारांना एकत्रित आणून बलवंत पार्सेकर यांनी १९१३ साली पहिली पार्सेकर संगीत मंडळी नाट्य संस्था निर्माण केली. ताराबाई, काशीबाई, मनाबाई, मेनका, जयवंती, शांता ही त्या वेळची पार्सेकर कलाकार मंडळींची यादी. शांताबाई ही त्या वेळची प्रमुख स्त्री व पुरुषाची भूमिका करणारी कलाकार, त्यांच्या जोडीला हिराबाई ह्या सहकलाकार. संत तुकाराम, रामराज्य, राजे शिवाजी अशी जुनी नाटके ही मंडळी सादर करायची. गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील देवगड, कुडाळ, मालवण, रत्नागीरी, वेंगुर्ला या भागात नाटकांना अफाट गर्दी असायची.
संसार नाटकाबरोबरच या मंडळींचा संसार नाटकाबरोबरच. गोवा, महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग व्हायचे. त्यामुळे १५-१५ दिवस दौर्‍यावरच राहावे लागायचे. त्यामुळे आपल्यासोबत बिर्‍हाडही हलवावे लागे. नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल झाला तरी कलाकारांच्या हाती मानधनाच्या रूपात अत्यल्प बिदागी येई. ताराबाई पार्सेकर यांनी तर वयाच्या ८ व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले होते. संपूर्ण नाटकाला २00 रुपये मिळायचे. त्यात पडदे, इतर तांत्रिक अडचणी आणि कंपनीचे मालक तर त्या वेळी नाटकाचे मानधन कलाकाराच्या हातात देण्याऐवजी थेट घरी आईवडिलांकडे द्यायचे. या नाटक कंपनीकडे पूर्वी देखील चांगले पडदे, सामग्री, वेशभूषेसाठी लागणारे ड्रेस, साहित्य, इतर सुविधा होत्या. तरीही बदलत्या काळानुसार यशापयश पचवावे लागायचे. नाटकात सुधारणा
स्त्री संगीत नाटक मंडळीने सादर केलेली नाटके गाजू लागली. त्यामुळे नाटक मालकांचाही उत्साह वाढला. नवनवीन प्रयोगाची संधी मिळाली. नवीन विषय, नवीन आशय घेऊन व नाट्यप्रेमींची नाडी ओळखून नारायण पार्सेकर व बाळा पार्सेकर या कंपनीच्या मालकांनी बदलत्या काळानुसार कंपनीत सुधारणा करून स्त्री संगीत मंडळीत पुरुष पात्रे आणली. त्यात वालावालकर, कृष्णा कोठवाळे, जीवबा गाड हे पुरुष कलाकार या नाटकात भूमिका करू लागले. नाटके चालत होती. नियतीला यश पाहता आले नाही. कंपनीत भांडणे वाढली. ही भांडणे मिटविण्यासाठी परशुराम बुवांनी परिश्रम घेतले. मात्र त्यांना यश आले नाही. १९३१ साली ही पहिली स्त्री नाटक मंडळी कंपनी देवगडमध्ये (महाराष्ट्र) फुटली. प्रमत्र मोहिनी या नाटकाचा या कंपनीने शेवटचा प्रयोग केला होता.
१८५६ साली नाटक संस्था स्थापन

मुंबईचे शिल्पकार व पार्सेचे सुप्रसिद्ध डॉ. भाऊ दाजी लाड यांनी १८५६ साली कालिदास सोसायटी नाटक कंपनी मुंबई येथे स्थापन केली होती. नाना शंकर शेट यांच्या सहकार्याने राजा, गोपीचंद ही दोन्ही नाटके मुंबईला या संस्थेमार्फत केली.
शतकपूर्तीनिमित्त प्रयोग : मांद्रेकर
गोमंतक मराठा समाज पेडणेचे प्रमुख अशोक मांद्रेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की पूर्वी व आताही गोमंतक मराठा समाजातील स्त्री कलाकार नाटकात काम करतात. १00 वर्षांपूर्वी जी स्त्री नाटक मंडळीची स्थापना झाली तीही याच समाजातील स्त्री कलाकारांना घेऊन झाली होती. शतकपूर्तीनिमित्त याच समाजातील गोवा व महाराष्ट्रात विखुरलेल्या स्त्री कलाकारांना एकत्र आणून यंदा प्रयोग करण्याचा संकल्प होता. मात्र ते शक्य झाले नाही. आता वळवई (गोवा) येथील नाट्यमंडळी हा प्रयोग सादर करणार आहे.
पार्से गावाने नाट्यपरंपरा टिकवली -कळंगुटकर
पार्से गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ कलाकार गणपत कळंगुटकर यांनी याविषयीची माहिती देताना सांगितले की, १९१३ साली या स्त्री कलाकारांचा पहिला नाट्यप्रयोग भगवती मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली दगड लावून रंगमंच तयार केला होता. आता त्या रंगमंचाची सुधारणा करण्यात आली असून याच रंगमंचावर १00 वर्षांनंतर प्रयोग होणार आहे

Friday, 19 April 2013

हौशी रंगकर्मींसाठी ‘कालिदास’ झाले स्वस्त

नाट्यपरिषद भरणार डिपॉझिट
नाशिक : हौशी रंगकर्मींना आर्थिक अडचणीपोटी कालिदास कलामंदिरात प्रयोग लावताना येणारे अडथळे दूर होणार आहेत. त्यासंबंधीच्या अडचणी
 लक्षात घेऊन अखिल भारतीय नाट्यपरिषदेने महाकवी कालिदास कला मंदिरचे डिपॉझिट स्वत: भरण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले होते. नाट्यपरिषदेने हा शब्द खरा केला असून, हौशी रंगकर्मींसाठी कालिदास स्वस्त दरात खुले झाले आहे.
येत्या काही दिवसांत एका नाट्यसंस्थेचा प्रयोगही लागणार असून, त्यासाठी कालिदासचे डिपॉझिट नाट्यपरिषदेने भरले आहे. सहा हजार रुपये कालिदासच्या डिपॉझिटमध्ये नाट्यपरिषदेने टाकले आहेत. आता नाट्यसंस्थेस केवळ 1700 रुपये प्रयोगासाठीचे भाडे द्यावे लागणार आहे. यात सातत्य राहिल्यास हौशी रंगकर्मींसाठी नाटकासाठी पोषक असलेले कालिदास नाट्यगृह कमी दरात खुले राहणार आहे. याशिवाय नाट्यपरिषदेच्या नव्या पदाधिकार्‍यांनी कामात वेग आणला असून, लवकरच बालनाट्य शिबिर व पुढील महिन्यात एकांकिका स्पर्धेचे आयोजन होणार आहे. महिन्याअखेरीस मध्यवर्ती कार्यालय स्तरावर रंगकर्मींची बैठक घेऊन त्यांना येणार्‍या अडचणी, सुधारणा, नवीन योजना याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Tuesday, 2 April 2013

हिमालयाच्या मदतीला धावलेला ‘सह्याद्री’ उपेक्षितच

जब्बार पटेल, अशोक हांडे यांचे यशवंतराव चव्हाणांवरील  नाट्यप्रयोग, चित्रपट, अडगळीतच
नम्रता भिंगार्डे । मुंबई    

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने दोन महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमध्ये लक्ष घातले होते. त्यांच्या जीवनावर आधारित अशोक हांडे यांच्या ‘मी यशवंत’ या दृकश्राव्य महानाट्याचे सादरीकरण आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट. मात्र, जन्मशताब्दी वर्ष लोटले तरीही या दोन्ही योजना कागदावरच राहिल्याने हिमालयाच्या मदतीला धावलेला ‘सह्याद्री’ उपेक्षितच असल्याचे  दिसते.
जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षी  100 कोटींची तरतूद करून गेट वे आॅफ इंडिया येथील  उद्घाटन सोहळ्यात यशवंतरावांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी घोषणांची आतषबाजी झाली होती. या कार्यक्रमात सादर झालेल्या अशोक हांडे यांच्या ‘मी यशवंत’ हे दृकश्राव्य महानाट्य सबंध महाराष्ट्रात आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले. वर्षभरात ‘मी यशवंत’ हा कार्यक्रम अन्य कुठेही झाला नाही. त्याचप्रमाणे यशवंतरावांच्या आयुष्यावर बेतलेला जब्बाल पटेल दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच नोव्हेंबर 2012 पर्यंत प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुण्यतिथी हातची गेली आणि जन्मशताब्दी  लोटली तरी हा सिनेमा अजूनही झळकलेला नाही.    
अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विनोद तावडे यांनी ‘त्या’ 100 कोटींचा जमाखर्च विचारला आणि सरकारचे प्रगतिपुस्तक चव्हाट्यावर आले. तर हिवाळी अधिवेशनातही तत्कालीन सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी अद्याप एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे सांगितले होते.     
महानाट्य, सिनेमाच्या आधारे यशवंतरावांचे कार्य राज्यभर पोहोचवण्याची संधी असतानाही जास्तीत जास्त निधी हा सातारा जिल्ह्यांत खर्च केल्याची सरकारी आकडेवारी सांगते. सातारा जिल्ह्यात ‘यशवंतराव आॅडिटोरियम’ बांधण्यासाठी 10 कोटी, सातारा जिल्हा परिषदेच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी 15 कोटी, ‘कृष्णाकाठी’ स्मारक बांधण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली. यशवंतरावांच्या नावाची निबंध स्पर्धा, वेणुतार्इंवर तयार झालेला लघुपट अशा लुटुपुटुच्या कार्यक्रमांतून यशवंतराव महाराष्ट्रभर पोहोचणार नाहीत हे मात्र निश्चित.

कार्याला मर्यादा घातल्या
४ यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात 100 कोटींचा निधी विविध योजनांवर खर्च करण्याची सरकारने गेल्या वर्षी घोषणा केली खरी, पण तो निधी कागदावरच आहे. आता 1 मार्चनंतर घाईघाईने सह्याद्रीलगतच्या चार जिल्ह्यांमध्येच यशवंतरावांचे कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न होत आहे. यशवंतरावांचे राजकीय वारसदार काहीच करत नाहीत.
विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते

   
दुष्काळामुळे प्रयोग रद्द
४राज्याच्या सहा महसुली विभागांत ‘मी यशवंत’चे प्रयोग होणार, असे आश्वासन त्या वेळी दिले होते. मात्र, महाराष्ट्रात पसरलेल्या दुष्काळामुळे प्रयोग रद्द झाल्याचे मला सांगण्यात आले. -
अशोक हांडे

Monday, 1 April 2013

संमेलनांमधून चळवळ उभी होते हे तर "अर्धसत्य'!


सदाशिव अमरापूरकर ः भूमिकांमध्ये सारखेपणा नव्हे नावीन्य हवे


नितीन नायगावकर ः  नागपूर

  "साहित्य संमेलन असो वा नाट्य संमेलन; यापैकी कुठल्याही माध्यमातून चळवळ उभी होत नाही, तर केवळ राजकारण घडते. त्यामुळेच बहुतेक संमेलने सरकारी रूप घेऊन पुढे येतात,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते व
सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केले.

"राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यासाठी संमेलनांचा वापर करतात. देणगी दिली की, आपल्या गावी संमेलने भरविता येतात आणि प्रेक्षकही मिळतात. अलीकडेच झालेले संमेलनांचे आयोजन ताजे उदाहरण आहे. जेव्हापासून शासनाने संमेलनांना पैसा द्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्याचे सरकारीकरण
झाले आहे,' असे ते सांगतात. चित्रपटसृष्टीच्या शंभरीमध्ये मराठीचे स्थान कुठे आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले, "या ना त्या कारणाने सरकार भरपूर प्रयत्न करते. त्याचे अगदी ताजे उदाहरण सांगता येईल.
चित्रपटसृष्टीतील पहिला "राजा हरिश्‍चंद्र' हा चित्रपट मराठीतील. त्यामुळे तीन ताज्या दमाच्या दिग्दर्शकांची निवड करून केंद्र सरकारने अर्ध्या तासाची फिल्म तयार करण्याची योजना आणली; पण फिल्मचा विषय मराठीशी संबंधित असावा, ही एक अट टाकली. चित्रपटाची भाषा कुठलीही असो; पण विषय मराठीशी संबंधित असावा, असे म्हटल्यावर अनेकांसमोर अडचणी उभ्या झाल्या. बघूया काय होते. शेवटी सरकारही दिवाळखोर आणि आपले मित्रही दिवाळखोर. कुणाबद्दल काय बोलणार?' सदाशिव अमरापूरकर भविष्यात कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार? या प्रश्‍नावर भूमिकांमधील सारखेपणा मला मुळीच आवडत नाही. त्यामुळे नव्या जाणिवांच्या चित्रपटांचा मला शोध असतो, असे ते सांगतात. "पूर्वी शंभर चित्रपट यायचे तर आज 25 चित्रपट येतात. जास्त चॉईस नाही आणि तेच तेच रोल करणेही आवडत नाही. आत्ताच "होऊ दे जरासा उशीर' हा माझा मराठी चित्रपट रिलीज झालाय. त्यातील भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शिवाय ऑस्करच्या समितीने
आपल्या डिरेक्‍ट्रीमध्ये उत्तम स्क्रीनप्ले म्हणून या चित्रपटाची नोंदही करून ठेवली आहे.'


"नव्या रंगकर्मींना संदेश देण्याइतपत मी मोठा झालेलो नाही आणि त्यांनी माझा संदेश ऐकावा, एवढे ते लहानही राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे माहितीचा ओघ आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा, एवढेच."

nitinnaigaonkar.blogspot.in

Friday, 29 March 2013

हिंदी नाटकात गुजरातचे मराठी मुखवटे

प्रार्थना बेहेरे
पीयूष रानडे

















लवकरच येणा-या एका नव्या हिंदी नाटकात प्रार्थना बेहेरे आणि पियूष रानडे ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. या निमित्ताने ही बडोद्याची मराठी जोडी हिंदी नाटकात चमकेल. विशेष म्हणजे याचं लेखन , दिग्दर्शन प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने केलं आहे.

चांगल्या बॅनरचा सिनेमा मिळाला की त्यातल्या नायक-नायिकेला इतर सिनेमांसाठी विचारणा होऊ लागते. अशांना मग एकामागून एक सिनेमे मिळत जातात. पण , ' जय महाराष्ट्र धाबा , बठिंडा ' मधली जोडी अभिजीत खांडकेकर-प्रार्थना बेहेरे ही जोडी त्याला अपवाद ठरली आहे. अभिजीतने मराठी नाटक स्वीकारलेलं आहेच. पण , त्यापाठोपाठ प्रार्थना बेहेरेही आता आगामी हिंदी नाटकामधून चमकणार आहे. तिचं हे पहिलंच नाटक असून , मूळ बडोद्याच्या असलेल्या प्रार्थनाचा हिंदीतला नायक असेल तिच्याच शहरातून आलेला मराठी कलाकार पियूष रानडे.

हे नाटक हिंदी असलं तरी याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने. यामध्ये अंजन श्रीवास्तव , रीमा हे कलाकारही असणार आहेत. आपल्या पहिल्या नाटकाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली , ' यापूर्वी मी टीव्ही , सिनेमा केला होता. पण , नाटकात काम केल्यामुळे एका कलाकाराची ग्रोथ होते असं मला अनेकांनी सांगितलं. म्हणून नाटक करायचं होतंच. पियूष हा माझा चांगला मित्र आहे. त्याने माझं नाव निर्मात्याला सुचवलं. मराठीपेक्षा माझं हिंदी चांगलं आहे. नाटकात हजरजबाबीपणा लागतोच. शिवाय भाषेवर प्रभुत्वही हवं. म्हणून मी आधी हिंदी नाटक निवडलं. पुढे मराठी नाटकातही मला काम करायचंय. '

या नाटकाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण हा फॅमिली ड्रामा आहे. कुटुंबातल्या विसंवादावर यामध्ये तिरकस भाष्य असेल. ' या कुटुंबात ही मुलगी बाहेरुन येते आणि तिचा या फॅमिलीला त्रास होऊ लागतो. पण , सुरुवातीला नकोशी वाटणारी ही मुलगी नंतर संपूर्ण कुटुंब बदलते असं याचं सार आहे. एकदम मॉड , बबली अशी ही भूमिका आहे ,' असंही प्रार्थनाने सांगितलं. विशेष म्हणजे , यात तिचा नायक असणार आहे पियूष रानडे. त्याचं हे तिसरं व्यावसायिक नाटक. ' बडोद्यात कॉलेजमध्ये असताना मी अनेक नाटकं केली. दरम्यान मी व्यावसायिक रंगमंचावर पाय ठेवला तो गुजराती नाटकातून. त्यानंतर दुसरं हिंदी नाटक केलं आणि आता हे तिसरं. प्रार्थना बडोद्याचीच असल्याने आमची ओळख होती. शिवाय या नाटकाची गरज लक्षात घेता , तिचं नाव मी सुचवलं. नाटकातल्या फॅमिलीमधला मी मुलगा आहे. सोबत अंजन श्रीवास्तव आणि रीमा असल्याने खूप शिकायला मिळतंय. ' बडोद्यात असताना पियूषने अनेक गुजराती , हिंदी , मराठी , उर्दू प्रायोगिक नाटकांमधून काम केलंय.

Wednesday, 27 March 2013

अवघे जग झाले रंगभूमी...

मूळचे नाशिकचे असलेले पण मुंबई व त्यानंतर सातासमुद्रापार अमेरिकेमध्ये रंगभूमी गाजविणारे दीपक करंजीकर व विद्या करंजीकर हे जोडपे आजवर अभिनयाचा प्रवास नाटक, सिनेमा, कविता यांसारख्या माध्यमातून करत आहेत. जागतिक रंगभूमीदिनानिमित्त त्यांच्या या समृद्ध प्रवासाबद्धल :
लहानपणापासून विद्या करंजीकर यांना अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात एक एकपात्री प्रयोग केल्यानंतर त्यांना सुवर्णपदक मिळालं आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी विचारणा झाली. नाना पाटेकरांबरोबर त्यांनी पहिलं ‘आई शप्पथ’ हे नाटक केलं. त्यानंतर दिलीप
प्रभावळकरांबरोबर ‘वट वट सावित्री’, सुधीर भटांच्या ‘ब्रम्हचारी’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. ब्रम्हचारी या नाटकाचे त्यांनी पहिले 187 प्रयोग केलेत. विद्या मुळच्या पार्ल्याच्या. लग्न होऊन त्या नाशिकला स्थायिक झाल्या आणि नाशिकच्या रंगभूमीला दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दोन रंगकर्मी मिळालेत. दीपक करंजीकरदेखील महाविद्यालयीन जीवनापासून हौशी रंगभूमीवर काम करीत होते. ‘त्या एका वळणावर’ हे दोघांची भूमिका असलेले व्यावसायिक नाटक अत्यंत गाजले. कॅलिफॉर्निया आर्ट असोसिएशन या संस्थेद्वारा त्यांनी महेश एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ नाटक तसेच अनेक एकांकिका केल्या. मराठीबरोबरच इंग्रजी व हिंदी नाटकांमध्ये काम केले. असोसिएशानद्वारा त्यांनी कवितेचा आॅपेरा म्हणजे सत्तर वर्षांमधले कवी व त्यांच्या शंभर कवितांवर आधारित नाट्यमय कार्यक्रम त्यांनी केला. याचबरोबर त्यांनी आठ इंग्रजी नाटके, सहा हिंदी नाटके व आठ-दहा मराठी नाटके या असोसिएशनमार्फत सादर केली. मराठीमध्ये विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सावर रे’ आदी नाटकांना तिथल्या मराठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांनी एव्हरीवन लव्हज द गुड त्सुनामी, व्हेअर देअर इज अ विल हे महेश दत्तानी या इंग्रजी लेखकाचे नाटक अशी अनेक नाटके सादर केली.
कॅलिफॉर्नियामध्ये भारतातून स्थायिक झालेली मराठीपेक्षा हिंदी लोकसंख्या जास्त आहे. नाटकची कवितेशी असलेली जवळीक लक्षात घेऊन त्यांनी मराठीतल्या 22 कवींच्या ग्रेस, कोलटकर, बहिणाबाई, विंदा करंदीकर यांच्या हिंदीत भाषांतरित कविता सादर केल्या याशिवाय नाटक करण्यास पूरक अशा देहबोलीच्या कार्यशाळा त्यांनी तिथे घेतल्या. तिथल्या इंग्रजाळलेल्या व भारतीय संस्कृती व समस्यांशी अनभिज्ञ असलेल्या नव्या भारतीय पिढीला त्यामुळे मराठी, हिंदी नाटकांची समृद्ध परंपरा कळण्यास मदत झाली.

Monday, 25 March 2013

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी; आपटे आपटले


नटराज पॅनलचा 13 मतांनी पराभव,  उपाध्यक्षपदी भुसारी 

बनावट मतपत्रिकांवरून वादाच्या वादळात भरकटलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जहाजाचे सुकाणू सावरण्यासाठी अखेर कॅप्टन मिळाला. परिषदेच्या अध्यक्षपदी रविवारी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची बहुमताने निवड झाली. जोशी यांना 28, तर त्यांचे विरोधक, ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांना 15 मते पडली.  
माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात पार पडलेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जोशी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रमोद भुसारी, प्रमुख कार्यवाह म्हणून दीपक करंजीकर, कोशाध्यक्षपदी लता नार्वेकर, सहकार्यवाहपदी भाऊसाहेब भोईर व सुनील वणजू यांची निवड करण्यात आली. प्रसाद कांबळी, प्रफुल्ल महाजन, सतीश लोटके, श्रीपाद जोशी, सुनील ढगे, दिलीप बेवरणकर, किशोर आयनवार व वि. ना. लोकूर यांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड झाली.   
जोशी यांचे उत्स्फूर्त पॅनल व आपटे यांचे नटराज पॅनल या दोघांनाही मुंबईत समान म्हणजे प्रत्येकी 8 मते पडली होती, परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोशी यांच्या पॅनेलला अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पॅनलचा परिषदेवर वरचष्मा राहणार, हे निश्चित होते; परंतु मतदारांच्या संख्येपेक्षा मतपत्रिकांचीच संख्याच जास्त भरल्याने या प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी दोन्हीही गटांनी केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरून मोठा गदारोळ उठला होता. या पेचावर मार्ग काढण्यासाठी मुंबई विभागाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत हे प्रकरण सहधर्मादाय आयुक्तांकडे नेण्यात आले. या बोगस मतपत्रिका प्रकरणाची पोलिस चौकशी अद्याप सुरू आहे.  


सर्वच भागांना प्रतिनिधित्व 
४यापूर्वी नाट्य परिषदेच्या कारभारावर केवळ मुंबईचीच मक्तेदारी होती, परंतु नव्या कार्यकारिणीत राज्यातील सर्वच भागांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याचा नाट्य परिषदेच्या कारभारावर चांगला परिणाम होणार असून राज्याच्या तळागाळात नाट्य चळवळ पोहोचेल. मराठी नाट्य चळवळीला भरभराटीचे दिवस येतील.
प्रफुल्ल महाजन,  कार्यकारिणी सदस्य

Saturday, 23 March 2013

राजकीय ‘नाट्य’

पीयूष नाशिककर
नाट्य परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हळूहळू त्यामागील राजकारणाने तोंड वर काढले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकच्या विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे पाहिले तर ठाकूर यांचा नाटकाशी काय संबंध? हा जरा संशोधनाचा भाग ठरेल. पण ठाकूर हे राष्टÑवादीच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची राष्टÑवादीतील मंडळींशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहेच. तसेच नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे मावळते अध्यक्ष आमदार हेमंत टकले हे नाशिकचेच. ते तर खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘थिंक टॅँक’ समजले जातात. तर नावाप्रमाणेच ठाकूर हेदेखील त्यांच्या विश्वासातील आहेत. दुसरीकडे  टकले यांचा पाठिंबा विनय आपटेंच्या नटराज
पॅनलला आहे.  नुकतेच झालेले नाट्यसंमेलन हे ‘साहेबांच्या’ बारामतीत झाले. या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला तर कुठेतरी नाट्य परिषद निवडणुकीच्या या राजकीय प्रयोगाची तालीम यापूर्वीच झाल्याचे स्पष्ट होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर हे नाशिक येथील विश्वास बॅँकेचे संस्थापक, अध्यक्ष, ‘अर्थ’ क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. असे असताना सहकार क्षेत्रात ‘ठाकूर’ची भूमिका वठवणाºया या पात्राला नाट्य क्षेत्रात ही भूमिका कशी मिळाली हा प्रश्नच आहे. त्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक कोणत्या निकषांवर केली हे आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे.
मोहन जोशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी नाशिकचा असण्यावर आक्षेपही घेतला होता. यावर ठाकूर यांनी आपल्याला या कामाबद्दल विचारण्यात आले आणि मी होकार दिला. जोशींना आक्षेप घ्यायचा होता तर नियामक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण पुन्हा मुद्दा तोच राहतो की, ठाकूरच का? त्यातही मतपत्रिका नाशिकला छापल्या गेल्या आणि मुंबईत तब्बल 1999 बोगस मतदान आढळल्याने ठाकूर यांच्याकडे अनेकांनी बोट दाखवले. अशा अनक मुद्द्यांमध्येच जोशी आणि आपटेंची पूर्वीची जखम ताजी होत होती. याची तयारी अगदी निवडणुकीच्या आधीपासूनच करण्यात येत होती. जरा मागे वळून पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आई रेणुका मातेच्या पवित्र ठिकाणीच रंगदेवतेची पूजा करणाºया मोहन जोशींनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उपाध्यक्ष हेमंत टकलेंनी अध्यक्षपदाची स्वीकारलेली सूत्रे आणि जोशींकडे मागितलेला हिशेब यामुळे जोशी दुखावले गेले होतेच.  दुसरीकडे जोशी अध्यक्ष असताना त्यांनी 2009 च्या बैठकांना आपटे आणि प्रशांत दामले सलग तीन वेळा गैरहजर असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याची नोटीस बजावली होती. त्यामुळेही आपटे दुखावले गेले होते. दोघांच्याही या जखमांवरची खपली कुठेतरी या निवडणुकीच्या निमित्ताने निघू पाहते आहे. त्यामुळेच हा कलगीतुरा रंगतो आहे. कदाचित याची कुणकुण ‘उत्स्फूर्त’ पॅनलच्या मोहन जोशी यांना यापूर्वीच लागली असेल. म्हणूनच त्यांनी विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचे आरोपही केले होते.
नाट्य परिषदेचे हे राजकारण केवळ मुंबईतच रंगले असे नाही तर रत्नागिरी, नाशिकमध्येही सत्तेसाठी चढाओढ झाली. रत्नागिरीत आमदार उदय सामंत हे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात लेखक प्र. ल. मयेकर यांनी अर्ज दाखल केला होता. सामंतांनी मयेकरांना सरळ माघार घ्यायला सांगितली. मयेकरांनीही दोन खडे बोल सुनावले. तिकडे असा फड रंगत असताना नाशिकमध्ये तर सुरुवातीला प्रत्यक्ष राजकारणच निवडणुकीत येत होते. जुने रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते आमदार बबनराव घोलप यांनीही अर्ज दाखल केला होता. निवडणुका झाल्यावर नाशिकच्याच एका ज्येष्ठ कलाकाराने येथेही बोगस मतदान झाल्याची तक्रार केल्याने हे राजकारण अधिकच तापले.  कलाकारांकडे आज तरी रसिक मायबाप आदराने पाहतात. पण त्यांच्यातील राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने असे चव्हाट्यावर आल्यावर यांना रसिकाश्रय मिळेल का, याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या मुखवट्यावरील रंग उतरायला वेळ लागणार नाही.

Tuesday, 12 February 2013

'घाशीराम'ची चाळिशी

लोकसत्तातून साभार
पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन या संस्थेने १६ डिसेंबर १९७२ रोजी 'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग सादर केला. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले हे नाटक वादविवादांनी आणि अनेक अर्थानी गाजले. तथापि भारतीय रंगभूमीवर ते आज एक मैलाचा दगड ठरले आहे. १६ डिसेंबर २०११ रोजी 'घाशीराम'ने ४० व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्ताने 'घाशीराम'च्या पहिल्या प्रयोगापासून ते 'थिएटर अ‍ॅकॅडमी, पुणे' या संस्थेने १९९२ पर्यंत देश-परदेशात केलेल्या प्रत्येक प्रयोगात सूत्रधाराची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीराम रानडे यांनी सांगितलेला 'घाशीराम'च्या तालमीपासून ते पहिल्या प्रयोगापर्यंतचा जिवंत इतिहास..

पुण्यनगरीत जायचं, राष्ट्र सेवादल कलापथकात आणि पी. डी. ए.मध्ये शिरायचं, पडेल ते काम करायचं आणि जमेल तसं शिकायचं; पण सांगली-मिरज सोडायचंच, असा निर्धार करून मी १९५९ मध्ये पुण्यात आलो. कलापथकाची दारं श्याम पटवर्धन, शाहीर लीलाधर हेगडे आणि निळू फुले यांच्यामुळे पटकन् उघडली. मात्र, पी. डी. ए.चं दार उघडायला तब्बल १२ वर्षांची तपश्चर्या करावी लागली. पुण्यात पी. डी. ए.चा प्रत्येक नाटय़प्रयोग, 'पुरुषोत्तम'च्या एकांकिका, राज्य नाटय़स्पर्धा या साऱ्या गोष्टींनी मी झपाटून गेलो होतो.
मी बी. एड्. करत असताना पी. डी. ए.चे श्रीधर राजगुरू यांचा माझा परिचय झाला आणि त्यांचं बोट धरून मी पी. डी. ए.मध्ये शिरलो. 'जब्बार पटेल एक नवीन नाटक करताहेत; तू संध्याकाळी ७- ७.३० च्या सुमारास गरवारे प्रशालेत ये,' असा त्यांनी मला निरोप दिला. तोवर जब्बार काय ताकदीचा कलावंत आहे, हे मी त्यांच्या ह्यजनावरह्ण, ह्यलोभ असावाह्ण, ह्यतू वेडा कुंभारह्ण, ह्यजादूगारह्ण, ह्यखून पाहावा करूनह्ण, ह्यअशी पाखरे येतीह्ण इत्यादी एकांकिका व नाटकांमधून जोखून घेतो. त्यांच्या एकतर्फी प्रेमातच पडलो होतो म्हणा ना! संध्याकाळी गरवारे शाळेच्या हॉलमध्ये गेलो तर माझ्याआधीच तिथं विशी-बाविशीची, गोरी-घारी २०-२५ पोरं जमली होती. कुणी काय, कुणी काय गाऊन दाखवलं. कुणी उतारा म्हणून दाखवला. मलाही काहीतरी म्हणून, करून दाखवायला सांगितलं गेलं. मी डाव्या कानावर हात ठेवून वसंत बापटांच्या महाराष्ट्राच्या पोवाडय़ातला काही भाग म्हणून दाखवला. आणि घरी परत आलो!
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने फर्गसनमध्ये सतीश आळेकर आणि सुरेश बसाळे भेटले. त्यांनी सांगितलं- 'आपण ह्यघाशीराम कोतवाल' हे विजय तेंडुलकरांचं नाटक यावर्षीच्या राज्य नाटय़स्पर्धेसाठी पी. डी. ए.तर्फे करतो आहोत. तुझी निवड केली आहे. लवकरच तालमी सुरू होतील.'
तालमीचा पहिला दिवस आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो.. दरदरून घाम फुटतो. सूत्रधाराची 'चुकलो बामणोजी, पाया पडतो बामणोजी, माफी असावी बामणोजी..' अशी छोटी छोटी संवादवजा वाक्यं म्हणताना तोंडाला फेस आला. आठ-दहा दिवस असा सिलसिला सुरू होता. सहकाऱ्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागली. आज अखेरचा दिवस. 'जमलं तर ठीक, नाहीतर 'घाशीराम'ला अखेरचा रामराम!' अशी खूणगाठ मनाशी बांधूनच तालमीला गेलो. त्या दिवशी जब्बारला काय वाटलं कुणास ठाऊक; त्यानं आज आपण स्टँडिंग रिहर्सल घेऊ असं ठरवलं. चंद्रकांत काळे आणि मी असा भटजी-सूत्रधाराचा प्रवेश सुरू झाला आणि काय कळ फिरली देव जाणे- आम्ही दोघे मुक्तपणे वावरू लागलो. 'तिसरा तुझा बाप, चावला तुला साप' असे म्हणून चंद्रकांत निघाला आणि मी 'अगंगंगं! विंचू चावला' असं म्हणत एक पाय हाताने धरून नाचू लागलो. चंदूही माझ्याभोवती गरागरा फिरू लागला. 'अहो, तुम्ही सरदार, माडीवाले, गाडीवाले, घोडीवाले, कुठेजी चालले?' असे संवाद म्हणताना एका पायाची मांडी घालत जमिनीवर बसकन् मारली. 'गाढवाच्या लग्ना'तील दिवाणजीच्या भूमिकेतील जातिवंत सोंगाडय़ा वसंत अवसरीकरची ही सही सही नक्कल होती. त्या दिवशीच्या तालमीत अंगात काहीतरी संचारल्याचा भास होत होता.
दुसऱ्या दिवसापासून कृष्णदेव मुळगुंद घामटं निघेपर्यंत आम्हाला नाचवायचे. स्वत:ही नाचायचे. मग यायचे संगीतकार भास्कर चंदावरकर. त्यांनी नवीन चाली बांधून आणलेल्या असायच्या. मला सर्व प्रकारच्या गाण्यांची आवड; पण सूर कशाशी खातात, याचा पत्ता नाही. आता आली का पंचाईत! सूत्रधाराच्या तोंडी शास्त्रीय ठुमरीपासून ते लावणी, कव्वाली, कीर्तनापर्यंत सर्व प्रकारची गाणी! पुन्हा 'आऊट' होण्याची पाळी! पण दिग्दर्शक जब्बार पटेलने हा नो बॉल डिक्लेअर केला. मी वाचलो. जब्बारने एका सूत्रधाराचे तीन भाग केले. रवींद्र साठे, चंद्रकांत काळे यांना शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक. त्यांच्या तोंडी त्या चालींची गीते. ते निळ्या पगडीतले परिपाश्र्वक आणि लोकगीतं, पोवाडा अशी मी बेसूर-भेसूर झालो तरी मला सांभाळून घेणारी कोरस पद्धतीची गाणी सर्व ब्रह्मवृंदाकडे- अशी योजना झाली.
तालमी रंगू लागल्या. सुरुवातीला तालमीला जायला टाळाटाळ करणारा मी आता कधी एकदा संध्याकाळ होते आणि नाच-गाणे आणि नाटकाची तालीम सुरू होते याची ओढ लागू लागली. अस्सल दारूडय़ाचे हात सूर्य डुबला की थरथरू लागतात आणि पावलं आपोआप गुत्त्याकडे वळतात तशी आम्हा सर्वाची अवस्था झाली. संध्याकाळी साडेसहा ते रात्री दोन-अडीच अशी अखंड तालीम जवळजवळ तीन- साडेतीन महिने सुरू होती. या काळात मी फक्त एकच दिवस गैरहजर होतो. तेसुद्धा वासुदेव पाळंदे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो म्हणून! जब्बार दौंडहून यायचा. रात्री तालीम संपवून आम्ही परतत होतो. संभाजी पुलाच्या चौकात जब्बार थांबला आणि 'गौरी गेली, नाना राहिले, घाशीराम कोतवालने गौरीवियोगाचे दु:ख काळजात ठासले।' या ओळी साभिनय म्हणून दाखविल्या. एकदा लकी रेस्टॉरंटपाशी, 'राम्या, आता तू योग्य ट्रॅकवर आहेस. चालू ठेव. नंतर मी तुला अधिक बारकावे सांगतो,' असं म्हणून जब्बारनेच दिलासा दिला. रोज नवनवीन काही सुरू होतं. पहिला अंक बसायलाच विलंब लागला. दुसरा अंक त्यामानानं लवकर बसला. डॉ. मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरूपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे.. किती किती जणांची नावे लिहू? असा मस्त संच जमला. नानाच्या लग्नाचा रंगमंचावरचा सीन तर मला वाटतं तासाभरात आकारला. ब्राह्मणांच्या लग्नात कोणकोणते धार्मिक विधी असतात, याची माहिती जब्बारने लिहून आणायला सांगितली. चंदावरकरांनी लोकगीताच्या परंपरेतील मस्त चाल करून आणली होती. तालीम सुरू झाली आणि चंदावरकरांनी मला सांगितलं- 'तालासुरांचा फारसा विचार न करता तुझ्या पद्धतीने बिनधास्त म्हण. चुकलास तर रवी, चंदू, आनंद आणि आख्खा कोरस आहेच.'
मग काय हो?
मी- माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन..
सगळे- याच्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन..
'होऽऽ माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन' असं म्हणत मी नकळत जी गिरकी मारली, ती बघून जब्बारनं जी दाद दिली ती मी कधीही विसरू शकणार नाही. पुढे मी अनेक प्रयोग केले, पण 'हाऊसफुल्ल' प्रयोगातही ती तशी दाद मी नाही मिळवू शकलो. मी कुठेतरी कमी पडलो, हे नक्की!
'घाशीराम'ची संहिता मी वाचली त्यावेळी नाना फडणवीसांच्या आणि त्याकाळच्या पेशवाईच्या कारकीर्दीविषयी मीही अज्ञानी होतो. काही जुजबी गोष्टी माहीत होत्या. अधिक खोलात शिरून त्यांचा जरा बारकाईने अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. लहानपणापासून मला वाचनाचे वेड. फर्गसन कॉलेजमधील ग्रंथपाल प्रभाकर साने आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध! त्यांच्या ओळखीने फर्गसन ग्रंथालयातील नाना फडणवीसांचे चरित्र (लेखक : वासुदेवशास्त्री खरे), 'घाशीराम कोतवाल' (लेखक : मोरोबा कान्होबा), नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, 'पेशवाईतील शिक्षा', 'पेशवाईतील पत्रव्यवहार', बेळगावच्या रानडे नावाच्या लेखकाने नाना फडणवीस आणि पेशवाईसंबंधी लिहिलेले पुस्तक, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकरांनी लिहिलेले 'सवाई माधवरावांचा मृत्यू'हे नाटक.. जे मिळेल ते साहित्य वाचून काढले. तेंडुलकरांनी नाटकात रंगविलेले 'गुलाबी' हे पात्रही एका जमाखर्चाच्या नोंदीत मिळाले. दिव्याच्या प्रसंगाचा तपशील 'पेशवाईतील शिक्षा' या पुस्तकात मिळाला. 'घाशीराम' आणि त्याचा मुलगा 'काशीराम' यांच्याविषयी वेगवेगळे संदर्भ मिळाले. ३१ ऑगस्ट १७९१ रोजी गुलटेकडी भागात घाशीरामला ब्राह्मणांनी दगडांनी ठेचून मारले, ही माहिती मिळाली. सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे (पाटीलबाबा) यांच्या राजकीय संबंधांविषयी माहिती मिळाली. माझी खात्री झाली की, नाटक लिहिण्यापूर्वी तेंडुलकरांनी या साऱ्या गोष्टींचा कसून अभ्यास केलेला आहे. नाटक कोणत्या पद्धतीने मांडायचे, याचा आराखडाही त्यांच्या डोक्यात पक्का आहे. सखारामबापू बोकील यांचा त्यांचे विरोधक 'वृद्ध कपित' असा उल्लेख करीत, हे वाचून 'माणूस काल, आज आणि उद्या सारखाच' याची खात्री पटली. 'घाशीराम कोतवाल'च्या निमित्ताने माझे बखरी, ताम्रपट, सनदा, पत्रव्यवहार यांचे नकळत बरेचसे वाचन झाले.
'घाशीराम'च्या यशाचे श्रेय कोणाला? यावर पुढे अनेक वर्षे उलटसुलट चर्चा झाल्या. याचे जब्बार पटेलांना श्रेय किती?, असा खवचट प्रश्नही अनेकांनी मला विचारला. आजवर मी त्याचे उत्तर दिले नाही, पण आज प्रथमच सांगतो- नाटक ही एक सामूहिक कलाकृती असते. लेखकापासून ते पडदा उघडणाऱ्या आणि पाडणाऱ्या प्रत्येकाचे त्यात योगदान असते. 'घाशीराम'च्या बाबतीत श्रेयाचा धनी कोण, हा प्रश्न निरर्थक आहे. पण निदान हे तरी मान्य कराल की नाही, की तेंडुलकरांनी लिहिलेल्या एका सूत्रधाराचे 'तीन' करणे, कलाकारांच्या गुणांप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेणे आणि नाटकाचे 'तीन तेरा, नऊ अठरा' न वाजवता ४०-५० नवख्या कलाकारांना हाताशी घेऊन गोळीबंद प्रयोग सादर करणे, हे दिग्दर्शकामुळेच घडले ना! 'आम्हाला विषय वादग्रस्त वाटतो, पण तुमचा प्रयोग बघून आमचा विरोध बोथट होतो,' असं एकाच वेळी आक्रमक आणि हळुवार होऊन सांगणारे असंख्य प्रेक्षक भेटले. ह्यया तुमच्या तेंडुलकरांना नेमकं वाईटच कसं दिसतं? चांगलं दिसतच नाही का?ह्ण असे अनेकजण आजही विचारतात. 'सगळंच गुडी गुडी लिहिणारे तेंडुलकर नाहीत. माणसाच्या, समाजाच्या मनाचा ठाव घेणारे, त्यांच्या वर्तनाचा चढता-उतरता आलेख मांडणारे तेंडुलकरांसारखे लेखक थोडेच असतात,'असं माझं त्यावर उत्तर आहे- 'पचत असतील तर स्वीकारा; नसेल तर त्यांच्याकडे पाठ फिरवा.'
'घाशीराम'च्या तालमी सुरू असताना हळूहळू एक गोष्ट माझ्या ध्यानी येऊ लागली की, पी. डी. ए.मधील सीनिअर मंडळी फारशी तालमींकडे फिरकत नाहीत. भालबा केळकर आणि एक-दोघे दोन-तीन वेळा येऊन गेले, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात तटस्थपणा जाणवला. मी अगदीच नवखा; तरीही भीत भीत एके दिवशी सुरेश बसाळेला 'असं का रे?' असं विचारलं. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर असं होतं- 'आमच्या संस्थेत ही पद्धत आहे. एकदा एखाद्याकडे काम सोपवलं की मधे त्यात कुणी लुडबूड करायची नाही. तू तुझं काम प्रामाणिकपणे करीत राहा.'
आज १४ डिसेंबर. रंगीत तालीम. केशवराव घुल्यांच्या साह्य़ाने पिंपरीच्या हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या हॉलमध्ये ती ठरली. वेळ- रात्रीची. रंगभूषाकार निवृत्ती दळवी व प्रभाकर भावे चकोट केलेल्या ब्राह्मणांच्या रूपात आम्हाला सजवू लागले. कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदराचा टिळा. पात्रे सजली. वाद्ये लागली. ध्वनी-प्रकाशयोजना झाली. रंगीत तालमीला स्वत: विजय तेंडुलकर आवर्जून उपस्थित होते. रंगीत तालीम छानच झाली. तालमीनंतर तेंडुलकरांनी काही कागद नाना फडणवीसांचे काम करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांच्या हाती दिले.
दुसऱ्या दिवशीच्या तालमीत जब्बार रंगीत तालमीतल्या त्रुटी आमच्याकडून घोटून घोटून दुरूस्त करून घेत होता तसतसा माझा शिणवटा वाढत चालला. शेवटी तर मी बधिरच झालो. तालीम संपवून घरी आलो आणि तापाने फणफणलो. अंग जाम ठणकू लागलं. रात्रभर झोप नाही. सकाळी सकाळी माझी पत्नी संजीवनी हिनं अण्णा राजगुरूंना फोन केला, 'अहो, यांच्या अंगात बराच ताप आहे. पलीकडून उत्तर आलं-'रामला म्हणावं, शांत पडून राहा. सगळं ठीक होईल.' सकाळी १० वाजता डॉ. विद्याधर वाटवे घरी हजर! आल्या आल्या त्यानं कमरेखाली दोन इंजेक्शनं खुपसली. गोळ्या-औषधं दिली. सख्त विश्रांती घ्यायची आज्ञा केली आणि वर 'संध्याकाळी ७ वाजता भरतवर ये,' असं सांगून तो निघून गेला. 'काहीतरी खा आणि मगच गोळ्या घे,' असं त्यानं निक्षून सांगितलं.
संध्याकाळपर्यंत मी अर्धवट गुंगीत होतो. उठलो. दाढी-आंघोळ केली. देवाला हात जोडून विनवणी केली- 'आम्ही सर्वानी खूप मेहनत घेऊन हा खेळ उभा केला आहे. तो निर्विघ्नपणे होऊ दे.'
तिसरी घंटा घणघणली. प्रेक्षागृहातील दिवे विझले. रंगमंचाचा दर्शनी पडदा बाजूला झाला. धूसर प्रकाशात मागील काळ्या पडद्याच्या पाश्र्वभूमीवर एक चौकोनी कमान! त्यावर मधोमध श्रीगजाननाची मूर्ती. रंगमंचाच्या मध्यभागी एक निरांजनाचे तबक. त्याच्यामागे प्रेक्षकांना जमिनीवर मस्तक टेकवून अभिवादन करणारा कोणीएक तरुण कलाकार. मृदुंगावर दमदार थाप पडली. मृदुंगाच्या तालावर तो कोणीएक उभा राहिला. तबकातील फुले त्याने प्रेक्षकांच्या दिशेने उधळली. निरांजनाच्या ज्योती अधिकच उजळल्या. मृदुंगाच्या लयीवर तो तरुण नाचू लागला. आता त्याच्या नाचाचा वेग वाढला. नृत्य संपवून तो रंगपटात गेला. रंगमंचावर अस्पष्ट प्रकाश. आणि पुन्हा प्रेक्षागृहातील दिवे उजळले. प्रेक्षकांच्या मागील बाजूने आवाज घुमला- 'श्रीगणराय!' हा घोष वाढत गेला. करवतकाठी धोतर, बाराबंदी, गळ्यात करवतकाठी उपरणे, डोईवर पेशवाई पद्धतीचे चक्री पागोटे, कानात भिकबाळी, कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदूर अशा वेशातील बारा-पंधरा ब्राह्मण 'श्रीगणराय'चा निनाद करीत प्रेक्षकांतून वाट काढीत रंगमंचावर अवतरले. त्यांनी रंगमंचावर रांग केली. हात जोडून पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले. पुन्हा मृदुंगावर दमदार थाप पडली. श्रीगजाननाचा मुखवटा धारण केलेला एक कलाकार रंगमंचावर आला आणि लयदार पावले टाकीत रंगमंचावर पदन्यास करू लागला. आता तो पाठीमागील नि:स्तब्ध असलेला ब्राह्मणांचा पडदा सजीव झाला. झुलू लागला. गाऊ लागला.
'श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी।।'
नमन संपले आणि ब्राह्मणांच्या पडद्यातील कलाकारांनी रंगमंचावर वेगवेगळ्या ठिकाणी वाद्यांच्या तालावर वेगवेगळे गट केले. वाद्यांचा वेग आणि आवाज टिपेला पोहोचला आणि सूत्रधाराने रंगमंचावर प्रवेश केला. 'हो! हो!! हो!!!' असा आवाज देऊन वाद्यांना थांबविण्याचा इशारा त्यानं केला आणि मागे स्तब्ध झालेल्या ब्राह्मणांची ओळख करून दिली.
'हे सर्व पुण्याचे ब्राह्मण!'
आता एक-एक गट आपली ओळख करून देऊ लागला. ह्यवेदान्तशास्त्री, ज्योतिषमरतड, आम्ही कुंभकोणम्, आम्ही बनारस..रंगमंचावर एक अद्भुत नाटय़ साकारत होतं. माझा ताप कुठल्या कु ठे पळून गेला होता. थकव्याचा पूर्णत: विसर पडला होता. पहिला अंक संपला नाना फडणवीसांच्या (मोहन आगाशे) स्वगत, पण जाहीर आदेशानं- 'घाश्या, अक्करमाश्या, केला केला तुला कोतवाल..'आणि सूत्रधाराने दवंडी घुमवली.. 'ऐका हो ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे होऽऽऽ' साध्या सुती धोतर-अंगरख्यातील घाशीराम धिमी पावले टाकीत रंगमंचाच्या मधोमध उभा राहिला. दोन ब्राह्मणांनी नम्रपणे त्याच्या अंगावर रेशमी अंगरखा चढवला. कंबरपट्टा बांधला. डोईवर सरदारी पगडी चढवली. तबकातील आसूड घाशीरामाच्या हाती दिला. घाशीरामाने रंगमंचावर विखुरलेल्या, नतमस्तक झालेल्या अवघ्या ब्राह्मणांवर करडी नजर फिरवली. त्याच्या हातातील आसूड कडाडला आणि त्याने विकट हास्य केले- हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ आणि पहिला अंक संपला. दुसऱ्या अंकाचा पडदा उघडला तोच मुळी अतिशय आक्रमक, अंगावर येणाऱ्या गीताच्या आणि पदन्यासाच्या तालावर. गीताचे शब्द तेच होते, पण त्यांचा आविष्कार अत्यंत वेगळा होता..
श्री गणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेर की धरी।।
ब्राह्मणांच्या पडद्याच्या मधोमध असलेला सूत्रधार पुढे आला आणि पुन्हा ह्यहोऽ होऽ होऽह्ण करीत पडद्याचा आवाज त्याने थांबवला आणि घोषणा केली-
'पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झाले.'
पडद्याचा कोरस घुमला- 'झाले!'
'त्याचा कारभार चाले हो, कारभार चाले।
गौरी बोले, नाना डोले, घाशीरामाचे फावले साचे।
गौरी नाचे, नाना नाचे, घाशीरामाचे फावले साचे।'
आणि पुढील कथानकात पुण्यावर कडक 'घाशीरामी' सुरू झाली. एके ठिकाणी घाशीराम फसला आणि अखेर शेवटी शेवट आला. एक हात जेरबंद करून घाशीरामाला ब्राह्मणांच्या पुढे सोडला.  संतप्त जमावाने त्याच्यावर दगडधोंडय़ांचा वर्षांव सुरू केला. जखमी, घायाळ, हिंस्र श्वापदासारखा रक्तबंबाळ घाशीराम गर्जना करतोच आहे- 'मी तुमच्या छाताडावर नाचलो. मारा, ठेचा मला.ह्ण मग एका भल्या धिप्पाड ब्राह्मणाने एक जड शिळा उचलली. आपल्या दोन्ही उंच हातांवर भक्कमपणे पेलली आणि जखमी घाशीरामाच्या मस्तकावर दाणकन् आदळली. घाशीराम गप्पगार झाला. आहे त्या स्थितीत जमाव गोठला आणि भग्न शिराच्या घाशीरामाचे मृत्युनृत्य सुरू झाले. ताशा कडाडला, टिपेला चढला आणि एका असहाय क्षणी तो धरणीवर कोसळला. कायमचा. जमावाने विजयी आरोळी ठोकली आणि धीरगंभीर पावले टाकीत नानांनी प्रवेश केला. सर्व जमावाने कमरेत वाकून त्यांना अभिवादन केले. नानांनी हातीच्या काठीने ढोसून घाशीराम नक्की मेला आहे, याची खात्री केली. त्यानंतर नाना रंगमंचाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आले. प्रकाशवलय फक्त त्यांच्यावर. मग नानांनी पुण्यनगरीला आवाहन केले- 'पुण्यपतनस्थ नागरिकहो! या नगरीवरील एक महान संकट सरले. एक रोग टळला. आपणा सर्वाना छळणाऱ्या नरकासुराचा- घाश्या कोतवालाचा वध झाला. श्रीच्या कृपेने सर्व यथायोग्य पार पडले. त्याची कृपा आपणा सर्वावर आहेच.. या शुभ घटेनेनिमित्त पुण्यामध्ये तीन दिवस उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे.'
आरोळ्या ठोकीत पांगलेला ब्रह्मसमुदाय पुन्हा रांगेत उभा राहिला. पुन्हा दणक्यात-
'श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।'चा द्रुतलयीत कोरस सुरू झाला. नानांनी गुलाबीला खुणेनं बोलावले. नानांच्या भोवती नाचून ती आत गेली. ब्राह्मणांचा पडदा घाशीरामाचे कलेवर ओलांडून पुढे आला. नानाही त्या बारा ब्राह्मणांच्या रांगेत सामील झाले आणि पुन्हा एकवार..
'श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेरच की धरी।।'चा गजर सुरू झाला. दर्शनी पडदा पडला. खेळ संपला.
१६ डिसेंबर १९७२! पुण्याच्या भरत नाटय़मंदिरात महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन, पुणे या प्रायोगिक संस्थेने सादर केलेल्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग अशा रीतीने निर्विघ्नपणे पार पडला.. पुढील काळात अनेक विघ्ने निर्माण करण्यासाठी, अनेक वादळे उत्पन्न करण्यासाठी आणि झेलण्यासाठी, कलावंतांची कसोटी पाहण्यासाठी, त्यांच्या सत्त्वपरीक्षेसाठी, समाजमन ढवळून काढण्यासाठी आणि आधुनिक मराठी रंगभूमीवरील 'माइलस्टोन' ठरण्यासाठी! या सर्व ऐतिहासिक घटनांचा मी एक साक्षीदार. ह्यघाशीरामह्णमधील सूत्रधार! बाकी इतिहास पुढे केव्हातरी. तूर्त येथेच अर्धविराम घेतो-
'तुम्हा तो सुखकर हो शंकर..'    

Monday, 11 February 2013

दगडमातीतील मूर्तीसह शोधली मूर्ती कलाकारातील

 पीयूष नाशिककर । नाशिक
कधी इतरांचा चेहरा रंगवला, कधी स्वत:च मुखवटे लावून उभे राहिले.  लेखक, दिग्दर्शकही झाले. 45 वर्षे राज्य नाट्यस्पर्धा गाजवली. ते ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर.. नाशिककरांचे दादा. 85 व्या वर्षातही तरुणांना लाजवणारे त्यांचे काम. त्यांच्या कारकीर्दीवर हा ‘स्पॉटलाइट’.

अमृतधाम परिसरातील आपली मूर्तीशाळेत कामात दंग दादा.
०    दादा तुम्ही कलाक्षेत्राकडे कसे वळलात?
    - दगडी मूर्तीकाम करणे हीसुद्धा एक कलाच आहे. आमच्या घरातील बुजुर्ग मंडळी हेच काम करीत. पंचवटीच्या पाथरवट लेनमध्ये राहताना आठ महिने मजुरी करून पावसाळ्यात घरी परतणारी माणसे आसपास रहायची. त्या चार महिन्यांत करमणुकीचे साधन काय? मग गाणी लिहायची, नृत्य. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच काम करू लागलो.
०    तुम्ही तळागाळातील माणसांना नाटक शिकवले...
    - कलाकार कुठून हो आणणार? आहे त्या मजुरांनाच उभे करायचे. बरं.. सगळे आंगठे बहाद्दर. मग आपणच वाचून दाखवायचे. उपाशी रहायचो, पण नाटक कारायचो.
०    पूर्वी स्त्री पात्र मिळायचे नाही..
    - मुलींना पालक कामच करू द्यायचे नाहीत. आई-वडील नसलेली एक मुलगी तयार झाली. तालमीला उशीर व्हायचा. तिला सोडायला जावे लागायचे. ते ‘लाल कंदील’ नावाचे नाटक होते. त्या मुलीला पहिले पारितोषिकही मिळाले होते. काही वर्षांनी मग मी माझ्या नंदा रायते या मुलीलाच नाटकात उभे केले. आता बिटको कॉलेजला प्राध्यापिका आहे.
०    विजय नाट्य मंडळ कसे स्थापन झाले?
    - नरसिंह व्यायामशाळा हीच आमची संस्था. 15 आॅगस्ट 1948 रोजी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सवात ‘नावीन्य विजय मेळा’ या नावाने मेळ्यांतून सहभागी व्हायचो. तोपर्यंत स्वत: काही लिहीत नव्हतो. वाचनाच्या आवडीतून माझ्यातील लेखक जागा झाला.
०    तुम्ही स्पर्धेकडे कधी वळलात?
    - 1959 साली मी ‘मानाचा जरीपटका’ लिहिले. त्यावेळच्या नाशिकच्या नाट्यसंघात मोहनराव करंदीकर, आनंद सबनीस, तात्यासाहेब कार्यरत होते. एका नाटकासाठी मला नेपथ्य, संगीतासाठी बोलावले.  पुढे सबनीस म्हणाले की, तुम्हीही राज्य नाट्यस्पर्धेत भाग घ्या. अनेक जण म्हणे बाम्हनांचं काम दगड फोडणाºयांनी कशाला करायचं? वाईट वाटायचं. अनेक कलाकार नाटक सोडून जात. 1968 साली राज्य नाट्यस्पर्धेत पहिलं नाटक सादर केलं.
०    मग दादा बक्षिसांचं काय?
    - 1970 मध्ये ‘लाल कंदील’ नाटक केले. त्याला बक्षिसं मिळाली. त्यानंतर बक्षिसांची रांग सुरू झाली. त्यानंतर ‘कुशीत एका जन्म आपुला’ नाटक लिहिले.  लक्ष्मण पैठणकरांनी त्याचे खूप चांगले परीक्षण केले. पण त्यात त्यांनी आमच्या काही चुकाही छापल्या.
०    खर्चाचे कसे करायचे?
    - पहिल्या वर्षी नाटक करायला 900 रुपये लागले होते. तांबटांनी लाईटची मदत केली. चार आणे, दोन आणे गोळा केले. नाटकातील मंडळींनी  त्यावर्षी दिवाळी साजरी केली नाही. (डोळ्यात पाणी)
०    व्यावसायिक नाटकाकडे नाही वळलात?
    - काम करून, घर सांभाळून, स्पर्धा करत खरं तर नाही वळता आलं. पण त्याचं फारसं दु:खही नाही. ‘रंगदेवता उभी वादळी’ हे प्रायोगिक नाटक मात्र मी नक्कीच केलं. ‘खुनी’ नावाची एकांकिकाही केली.
०    निर्व्यसनींचे मंडळ अशी विजय नाट्य मंडळाची ख्याती आहे...
    - आमच्या घटनेतच तसे लिहिले आहे. एकदा मंडळाचा अध्यक्ष दारूच्या आहारी गेला. तो अध्यक्ष होता, पण नाटकाची सूत्रे माझ्याकडे होती. लिहिलेले मीच होते. त्याची मुख्य भूमिका असतानाही मी कापली आणि नाटक केले. निर्व्यसनामुळेच गेली 45 वर्षे श्रीराम विद्यालय आम्हाला तालमीसाठी जागा देते.

किस्से
 आचार्य अत्रेंचे ‘कवडी चुंबक’ नाटक बसविले होते. ते सेंट्रल जेलमध्ये करायचे होते. कोणीतरी म्हणाले की, लेखकाची परवानगी घेतली आहे का? त्याच वेळी जेलच्या आसपासच कुठेतरी त्यांचे भाषण होते. मग आम्ही जुने नाटक मेकअप करता करता म्हणालो. तेच सादर केले. त्यावेळी कवडी चुंबक केलेच नाही.

एकदा नांदूरला नाटक असताना ते लोक म्हणे, ‘शेतातच नाटक करा’. किमान एखादा उंच ओटा तरी हवा ना! मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ‘सुभेदाराची सून’ हे नाटक सादर केले.


पत्नीची आठवण येते
    - माझ्या या कारकीर्दीत कुटुंबाची मोठी साथ मला मिळाली. नाटक करायचो तर 11 रुपये पूर्ण नाटकाला मानधन मिळायचे. त्यातच पत्नी फार आजारी पडली. तिला स्मृतिभ्रंश झाला. मुलं मात्र मोठ्या कष्टाने शिकली. आज पत्नी बरोबर नाही. तिची आठवण येणारच..

Friday, 8 February 2013

...यामुळेच घेतली निवृत्ती




'ना-ना तर-हेची नाटकं - भाग:३ (समाप्त )
४५ वर्षे सलग राज्य नाट्य सपर्धा केल्यानंतर नेताजी दादांनी घेतली निवृत्ती

गेल्या ४५ वर्षांपासून राज्य नात्य स्पर्धेत सातत्याने भाग घेणा-या नेताजी भोइर यांनी या स्पर्धेतून घेतलेली निवृत्ती वयपरत्वे असल्याची चर्चा नाट्य वर्तुळात असली तरी स्वत: दादांनी मात्र वर्षनुवर्षे निकालात होणा-या राजकारणामुळेच आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले.

यंदा दादांनी स्वलिखित, दिग्दर्शित आणि अभिनित 'जाग व्हा र जाग व्हा ' या नाटकाच्या शीर्षकातूनच जणू एक संदेश दिला. त्यांच्या नाटकाला तिस-या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले, अन दादांना रौप्यपदक; मात्र दादांनी 'आता या घाणेरड्या वातावरणात नकोच' अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

एकच नाटक, एकाच संस्था पुन्हा-पुन्हा सादर करते याला विरोध व्हायलाच हवा. यंदा नियम आला आहे की, जुनी नाटकेही चालतील. पण तो नियम सोयीस्करपणे वापरला जात आहे. त्यात असेही आहे कि, यापूर्वी ते नाटक सादर केलेल्या संस्थेला पुन्हा तेच नाटक सादर करता येणार नाही. आता काही तांत्रिक बदल करून ते नाटक सादर होत आणि परीक्षकही त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे हे सगळच हास्यास्पद आणि चिंताजनक आहे. निकालातच राजकारण झाले तर हि मुल स्पर्धेत येतील का?  उलट तरुण रंगकर्मींना या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी मार्गदर्शन करायला हवे. गेल्या ४५ वर्षात एकदाही निष्पक्ष निकाल लागलेला नाही. यंदा तर माझे नाटक होण्यापूर्वी पाच दिवस आधीच माझ्या कानावर चर्चा आली होती की, निकाल आधीच लागलेला आहे. माझ्याच मंडळाची माणस म्हणतात, 'दादा, मग स्पर्धा कशाला करायची?' पण तात्यासाहेबंनी (कुसुमाग्रज ) मला सांगितले आहे की, नाटक प्रेक्षकांसाठी कर. मी तेच लक्षात ठेवले होते. पण, आता अश्या होते आहे. परीक्षक विकले जातात. अशा घटना तर किती घडल्या आहेत. अशी परखड मते दादांनी व्यक्त केली.

जुन्या अनुभवांचा दाखला

गेल्या वर्षीचा अनुभव
गेल्या वर्षी अल्फाबेटिकली माझे नाटक सादरीकरणासाठी पहिले होते. पण, माझ्या नाटकातील अभिनेत्रीला दुखापत झाली होती. त्यावेळी मी संयोजकांना विनंती केली कि, दोन दिवस माझे नाटक पुढे ढकला. पण मला तुम्ही नाटकच करू नका असे सांगण्यात आले.

निकाल लांबला दीड महिना
१९७६मध्येही असेच राजकारण झाले होते. त्यावेळी मी विरोध केल्याने माझे नाव 'काळ्या यादीत' टाकले होते; पण मी लढत राहिलो. त्यावेळी दीड महीन निकाल माझ्यामुळे लांबला होता. अधिकारी पदावर राजाराम हुमने होते. त्यांनी विनंती केली कि, दादा यापुढे असे होणार नाही. स्टे मागे घ्या, आणि मग त्या स्पर्धेचा निकाल लागला होता.

... तेव्हाच घेणार होतो राजा
१९९६मध्ये मी 'संगीत सागराच्या अंतरी' हे नाटक सदर केले होते. त्याचे लिखाण, दिगदर्शन, सादरीकरण याला पारितोषिक आणि दोन रोउप्यपद्केहि मिळाली होती. तरीही आमचे ते नाटक नंबरात नव्हते. खर तर मी त्याच वेळी राजा घेणार होतो.

न सुटणारा 'एका निकालाचा झांगडगुत्ता'


'ना-ना' त-हेचि नाटकं - भाग:२

समन्वयक, परीक्षकांनी केला गुंता सोडविण्याचा प्रयत्न
राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल आणि वाद हे समीकरण नवे नाही. मात्र हा वाद का, कोणामुळे आणि कशासाठी होतो याची चर्चा नेहमीच धुसर, अस्पष्टच होते, आणि हा झांगडगुत्ता वाढतच जातो. यंदाही परिस्थिती  तशीच आहे पण, या परिस्थितीला उत्तर देत समन्वयक आणि परीक्षकांनी गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

हा गुंता सोडविताना समन्वयक राजेश जाधव म्हणाले की, 'गोदो'बद्दल फार कोणाचा रोष नाही. रोष आहे तो गाय्धानिंच्या 'रात्र काळी घागर काळी' या नाटक्बद्दल. हे नाटक वेगळ्या नावाने आधी दोन वेळा सादर झाले आहे. आता नियम ३ क़ असे सांगतो की, एकाच नाटक एकाच संस्थेला पुन्हा सदर करता येणार नाही. पण, या संस्थेने त्याचे ना बदलून वा त्यात अंतर्गत काही बदल केले असतील आणि त्यांना शासनाने प्रमाणपत्र दिले असेल तर आपण किंवा परीक्षक काय करणर? यासाठी सहभागी संस्थांनी स्पर्धेपूर्वीच पावलं उचलायला हवी. शहरात कोणती संस्था काय सदर करणर आहे, याची चर्चा होत असते. मग त्याच वेळी इतर संस्था आक्षेप का घेत नाहीत? समन्वयक हा संघ आणि शाषण यांच्यातील दुवा आहे. तो काय करणर?

तर याच गोंधळावर परीक्षक भाग्यश्री काळे यांनीही भाष्य करताना सांगितले की, हा निकाल अगदी चांगला लागला आहे. आता 'रात्र काळी घागर काळी'यावरून जो वाद होतो आहे, त्याला दोन बाजू आहेत या संघाने नियमाप्रमाणे पूर्तता केलेली आहे. त्याला शासन किंवा परीक्षक काही करू शकत नाही. नाटकही य्त्तम होते. तरीही मी स्वत: शासनाला विनंती करणार आहे की, सर्व परीक्षकांची बैठक घेऊन या जुन्या आणि नवीन नाटकांबद्दल काही तरी तोडगा काढावा. खरतर नवीन संहिता यायलाच हव्यात. नेताजी भोइरन्सर्खे ज्येष्ठ कलावंत दरवर्षी नवीन नाटक लिहून सादर करतात. तर मग इतरांनी का करू नये? उलट यंदा शासनाने समन्वयक नेमल्याने स्पर्धा उत्तम झाली. सांस्कृतिक खात्याच्या संचालकांना येथे येउन त्याची दाखल घ्यावी लागली. हे कमी आहे का?

Thursday, 7 February 2013

'स्पर्धा काळी, निकाल काळा'



'ना-ना' त-हेची नाटकं - भाग:१

 राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाबद्दल उभयपक्षी मतप्रदर्शन 

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या 'रिझल्ट मान्य नाही...' असाच सूर अनेक नाटकवाल्यांनी व्यक्त केला. रिझल्टमध्ये प्रवासात खाडाखोड झाल्याची माहिती काही जणांना त्यांच्या सूत्रांनी दिल्याने आता नाशिकमध्ये नाटक करावं की नाही इथपर्यंत शंका घेण्यात येत आहे, तर परीक्षक, समन्वयक यांच्या  म्हणण्यानुसार शासनाच्या, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण महामंडळाच्या नियमांचा हा फटका आहे. काही संस्थांनी 'स्पर्धा काळी, निकाल काळा' अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 या विषयी 'अश्वमेध'च्या कलाकारांनी  अन्याय  होत असल्याचे व्यक्त केले. मागील वर्षी संपूर्ण राज्यात प्रथम आलो होतो यंदाही आमचे 'फिल्मसिटी' 'आणि 'गोदो वन्स अगेन'मध्येच स्पर्धा होती. आम्ही अर्ज करायला गेलो तेव्हाच नाशिकच्या समन्वयकाने 'तुम्ह्च्या विरोधात वातावरण आहे, अर्ज कशाला करता' असे वक्तव्य केल्याने धक्का बसला होता आता चुका जाणून घेण्यासाठी संबंधिताना फोन करतोय; पण कोणीच बोलायाल तयार नाही. काहीतरी 'फिक्सिंग' झाले आहे. स्मित तळवलकर, विनय आपटेही आमची नाटक उचलून धरतात. मग  आमच्यावर असा अन्याय का? अशी प्रतिक्रिया प्राजक्त, प्रणव, श्रीपाद यांनी व्यक्त केली.

 अग्नेय  क्रिएशनच्या कलाकारांनीही अगदीच निकाल योग्य आहे हे म्हणणे चूक आहे. 'गोदो' एक नंबरला ठीक आहे. पण इतर  काय ? वैयक्तिक पारितोषिकही असेच. परीक्षकांनी कदाचित भूमेकेची लेन्ग्थ  बघून बक्षिसे दिली. त्यामुळे अनेकांना पात्रता नसताना बक्षिसे मिळाली. लोहीतावादी  सुधीर कुलकर्णी यांनीही 'गोदो'बद्दल काही म्हणन नाही. पण, इतर दोन नाटकांचे काय? नेताजी भोइर यांचा सन्मान व्हायलाच हवा. पण, इतरांवर अन्याय करून? आणि रात्र काळी घागर कलीच काय? राज्य नाट्य स्पर्धेतच सदर झालेल्या 'राजा वाक्रपात' या नाटकाच नाव बदलून त्याच स्पर्धेत नाटक सदर करण लाजीरवाण असल्याचे व्यक्त केले.   

 तर ज्या 'रात्र काळी घर काळी' या नाटकाविषयी हा वाद निर्माण झाला त्या नाटकाचे दीपक मंडळाचे सुरेश गायधनी यांनी, मलाही हा निकाल अनपेक्षित असल्याचे सांगितले. हे कलाकारांच्या कष्टाचे फळ आहे. पाच प्रयोग करायचे होते म्हणून मी ते राज्य नाट्य स्पर्धेत घेतले. 'फिल्मसिटी', 'एका रात्रीचा झांगडगुत्ता' यांचाही विचार व्यायला हवा होता. नेताजी भोइर दरवर्षी परीक्षक सांगतील ती निकाल अखेरचा मानतात तोच आदर्श सर्वांनी ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली.